कवीचे काम?
अनाम्याला नाव देणे,
अफरातफरीकडे बोट दाखवणे,
बाजू घेणे,
युक्तिवाद करणे,
जगाला आकार देणे,
आणि त्याला निद्राधीन होण्यापासून थांबवणे.
– सलमान रश्दी, सॅटानिक व्हर्सेस, (कवी बाळने केलेले वर्णन )
त्या विस्तृत दालनातला उजेड मंद होता. अंधाराची सवय करून घेत मी आत शिरलो
आणि मला पांढऱ्या कागदातून चिरून बाहेर पडत असलेली ताठ अणकूचीदार टोकांची अंधुक बाह्यरेषा दिसली. ती टोके एखाद्या ध्वजदंडाप्रमाणे दिसत होती, आणि कागद ध्वजाप्रमाणे शुभ्र, पण ती शुभ्रता शरणागतीची नव्हे, तर शुद्धता दर्शवणारी होती. त्या कागदांवर शब्द होते, ते खोडून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या हुकूमशहांच्या तावडीतून वाचलेले शब्द.
उंच छतावरून ध्वनिक्षेपक खाली लटकले होते, ते अगदी आपल्या चेहऱ्यासमोर आलेले
होते. ते जवळ जवळ शंभरेक होते, विखुरलेले, ज्यांची धडे गायब झालेली आहेत आणि नुसतीच मुंडकी लटकत आहेत असे ते दिसत होते. ते ध्वनिक्षेपक काळे होते. तुम्ही त्यातून बोलू शकत नव्हता, फक्त ऐकू शकत होता. त्यांत लपलेल्या ध्वनिक्षेपकांतून मोठे स्वर निघत होते. ते कवींचे शब्द होते, त्या कागदांवर टाइप केलेले, आणि ती उर्मट अणकूचीदार टोके त्यांतून छेदून जात त्यांना नष्ट करू पाहात होती.
पण ते शब्द कित्येक पिढ्यांना ओलांडून पुढे आलेले होते– गीतांमधून, कवितांमधून, कूजबुजीतून, इतकेच नव्हे तर पाठांतर करीत असतानाच्या स्तब्धतांमधून.
कूणी तरी रोखून धरावा तसा उजेड आत सोडला गेला होता. सावल्या ओळखू याव्यात इतपत, आकृतींच्या पुश: बाह्यरेषा दिसाव्यात इतपत. आलेले कलारसिक कोठडीतल्या कैद्यांप्रमाणे, तुरुंगातील रक्षकांप्रमाणे इकडेतिकडे हिंडत होते. तिथला उजेड तुरुंगातल्या कोठडीत असावा तेवढाच होता. तो वाचता येईल एवढा पुरेसा नव्हता आणि झोपता येईल एवढा गडदही नव्हता. तुमच्यापासून लख्ख उजेड हिरावून घेतला आहे आणि अंधारही चोरून घेतला आहे याची जाणीव करून देणारा तो उजेड होता. कारण तुम्ही नाव नसलेले एक कैदी आहात, क्रमांक नसलेल्या कोठडीतले.
उजेड, आयुष्याप्रमाणेच, बाहेर होता, तुमच्या आवाक्याबाहेर.
काही स्वर इतरांपेक्षा मोठे होते. हिंदी, चिनी, अरब, अझेरी, इंग्रजी भाषेत आणि होती कूजबूज. कम्युनिस्टांच्या काळात पूर्व युरोपात असे म्हटले जायचे की, जेव्हा लिखित शब्दावर विश्वास ठेवता येत नाही, तेव्हा आपण बोललेल्या शब्दावर विश्वास ठेवतो. कागदाच्या लहानशा कपट्यांवर लिहिलेले शब्द वाचल्यानंतर तो कागद चावून गिळून टाकायचा, म्हणजे कूणालाही कळणार नाही की तुमच्याजवळ तो कागद होता. कोणीही कधीही त्यावरचे हस्ताक्षर ओळखू शकणार नाही. एका कानातून दुसऱ्या कानात गेलेले शब्द. ऐकणारे आणि आठवण ठेवणारे कान, जमिनीला लावलेले कान, कॅरोलाईन फोर्शच्या, १९७८ मध्ये एल साल्वादोर येथे एका जनरलच्या भेटीनंतर लिहिलेल्या, कवितेप्रमाणे. मनात घुमत राहणारी कूजबुज. बाकी केवळ शांतता.
शिल्पा गुप्ता यांचे नितांत हलवून सोडणारे मांडणीशिल्प फॉर, इन योर टंग आय कॅन नॉट हाईड (तुमच्या भाषेत मी लपू शकत नाही) प्रेक्षकाला एका बहुसंवेदनात्मक प्रवासातून घेऊन जाते, एखाद्या कवीला कैदेत टाकल्यावर जी दहशत, एकाकीपणा आणि असमर्थता अनुभवावी लागते, ती कशी असते, हे जाणून घ्यायला, जी केवळ विचार करणे, चिंतन करणे, व्यक्तत करणे, आणि लिहिणे याकरिता झालेली कैद असते. आणि ते अनुभव, जे वर्णन करायला कठीण असतात, कसे अत्यंत प्रभावी व प्रेरणादायक शब्दांमध्ये रूपांतरित होतात हे समजून घ्यायला. एका सहस्रकापर्यंत मागे जाता येईल अशी ही गाथा आहे.
शिल्पाचे हे मांडणीशिल्प तिच्या कामात पुन:पुन्हा येणाऱ्या आशयसूत्रांतून साकार झालेले आहे. शिल्पाने एकदा म्हटले होते, कधीकधी शब्द अशा प्रकारे बेचैनी निर्माण करतात की सत्तेत असलेले लोक कल्पनाशक्ततीला रोखण्याचा प्रयत्न करतात. तिने म्हटले आहे, भारतातील बदलत चाललेले वातावरण, जे दिवसेंदिवस प्रतिबंधात्मक होत चाललेले आहे, उदारमतवादी विचारवंत, लेखक, दिग्दर्शक यांना लक्ष्य केले जात आहे, हे पाहताना हे काम स्फुरले आणि मी शब्दांच्या सामथ्र्यात आणि त्या शब्दांमुळे सत्तेत असलेल्या लोकांना वाटत असलेल्या अस्वस्थतेत रस घेऊ लागले.
पण त्यांना याची कल्पना होतीच की ही कथा केवळ भारतापुरती मर्यादित नव्हती. सोळाव्या शतकात जार्दानो ब्रुनोला जाळून टाकण्यात आले आणि त्या आधी एका शतकापूर्वी अलेप्पोमध्ये इमादेद्दीन नेसिमी याचे त्याच्या पाखंडी मतासाठी जिवंतपणे कातडे सोलून काढण्यात आले. चीनमध्ये लिऊ झाओबो याला तुरुंगात टाकण्यात आले, मृत्यूपूर्वी काही आठवड्याच्या आधी त्याला सोडण्यात आले, इतकेच नव्हे तर सरकारने त्याच्या दफनविधीला परवानगी दिली नाही; इस्रायलमध्ये क्रांतिकारी कविता लिहिल्याबद्दल पॅलेस्टिनी कवी दारीन तातोर याला तुरुंगात टाकण्यात आले. ओसिप मांदेलस्ताम याने आपल्या एकाकी स्टालीनकालीन कोठडीत लिहिले होते, तुम्ही माझे ओठ माझ्यासाठी शिल्लक ठेवले, ते माझ्या शब्दांना आकार देतात, स्तब्धतेतदेखील. आणि टर्की येथील नाझिम हिकमत यांनी हलील या कैद्याबद्दल लिहिताना म्हटले होते की, ते हातकड्या घातलेल्या हातांनी पाने पलटवण्यात पटाईत होते.
मला स्पष्टपणे आठवणारी पहिली विद्रोही कविता म्हणजे मराठीतील मंगेश पाडगावकर यांची सलाम. मी जेमतेम तेरा वर्षांचा असताना इंदिरा गांधींनी भारतात आणीबाणी जाहीर केली होती आणि पंधराव्या वर्षी, १९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला मी पाहिला. पाडगावकरांची उपहासगर्भ कविता :
सलाम.
सलाम, सबको सलाम,
ज्याच्या हातात दंडा
त्याला सलाम,
लाथेच्या भयाने
डावा हात गांडीवर ठेवून
उजव्या हाताने सलाम,
बघणाऱ्याला सलाम,
न बघणाऱ्याला सलाम,
विकत घेणाऱ्याला सलाम,
विकत घेण्याचा इषारा करणाऱ्याला सलाम,
सलाम, भाई, सबको सलाम
आम्ही भयभीत झालो होतो, स्वत:चे रक्षण करण्याच्या काळजीत होतो. पाडगावकरांनी आमचा भित्रटपणा नेमका पकडला आणि त्याची खिल्ली उडवली. त्यांनी आमची भर्त्सना केली आणि चेष्टा केली. त्यांना आम्हाला जागे करायचे होते. कविता म्हणजे केवळ शब्द असतात, पण ते शब्द जाग आणू शकतात. आणि ते शब्द सत्तेत असणार्यांना त्रस्त करतात- कॅमेरून, क्यूबा, चीन, भारत, इराण, कझाकस्तान, म्यानमार, सौदी अरेबिया, टर्की, युगांडा, व्हिएतनाम अशा अनेक देशांतल्या सरकारांनी कवींना तुरुंगात टाकले. जगातल्या अनेक भागांत झुंडींनी कवींना लक्ष्य केले आणि त्यांच्यावर हल्ले केले. ही परिस्थिति निराश करणारी होती. सत्ताधार्यांना दुखावण्याच्या भयाने आम्ही आमचे शब्द गिळून टाकायला शिकलो.
अॅना अख्मातोवाच्या मुलाला तुरुंगात टाकण्यासाठी नेण्यात आले आणि तिचे सहयोगी कवी १९२० आणि १९३०च्या दशकांत रशियन कॅम्प्समध्ये मरण पावले आणि व्हॅलेरिया नोवोद्व्होर्स्कायाला, तिने १९६९च्या भेदक कवितेत कम्युनिस्ट पक्षावर आरोप केल्यानंतर, सायकीअॅट्रिक कॅम्पमध्ये पाठवण्यात आले, अशा जिद्दी स्त्रियांच्या पारध-कथा रशियात सातत्याने घडत राहिल्या, इरिना रातुशिन्सकायाने युक्रेनमधल्या रशियन वर्चस्वाला आव्हान दिले, ती लिहिते की,
हे शतक अधिकाधिक काळेकूट्ट होत चालले आहे आणि पुढचे लवकर येणार नाही;
कालच्या तुरुंगातील भिंतींवरची नावे स्वच्छ पुसून काढण्यासाठी.
हे आवाज गृहीतांविषयी प्रश्न विचारतात आणि पूर्वरचित धारणांना आव्हान देतात, आणि जे सुरू आहे त्याविषयी सवाल करतात. हा प्रवास सोपा नसतो. कल्पना तशीच राहते, ती प्रत्यक्षात आणू पाहणारे बदलतात आणि कदाचित एके दिवशी हे जगही बदलू शकेल.
सलमान रश्दी यांच्या सॅटानिक व्हर्सेसमधल्या ओळी आठवाव्या.
कूठल्या प्रकारची धारणा आहेस तू? अशी जी तडजोड करते, सौदा करते, समाजाशी जुळवून घेते, स्वत:साठी एक जागा तयार करू पाहते, जिवंत राहण्यासाठी; की तू ती मूर्ख शिव्या खाल्लेली ताठ मानेची कल्पना आहेस, जी एखाद्या झुळकेबरोबर वाहून जाण्याऐवजी तुटून जाणे पत्करेल- जी शंभरपैकी नव्व्याणव वेळा तुकडे तुकडे करून चिरडून टाकली जाईल, पण शंभराव्या वेळी जग बदलून टाकेल.
नवीन कल्पना फोफावल्या पाहिजेत, कल्पनाशक्तती चिरडली जाऊ नये. पण नवीन कल्पना केवळ एका मुक्त मनातूनच उपजतील. नवीन कल्पना आपल्याला विचारांच्या अशा धाग्यांना एकत्र आणायला मदत करतात, जे वेगवेगळे वाटतील, पण ते तसे नसतात. आणि कविता हेच कार्य करत असते-रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी म्हटल्याप्रमाणे कवीचे या जगाशी एखाद्या प्रियकरासारखे भांडण असते. कवी जे बघतो त्यावर तो टीका करतो, कारण जे गमावले जात असते त्यावर त्याचे प्रेम असते. कविता ही सत्य सांगते, वस्तुस्थिती नव्हे; सत्ताधार्यांना खूष करण्यासाठी वस्तुस्थितीमध्ये ढवळाढवळ करता येते, सत्यात ती करता येत नाही. कविता ही स्वातंत्र्याविषयी असते, ती मागे रोखून पाहणारे सत्य असते. ज्यांचे पैशात किंवा मालमत्तेत मोल करता येत नाही अशा गोष्टींविषयी ती असते. कवितेत काही पैसा नाही असे सांगितल्यावर, रॉबर्ट ग्रेव्ज म्हणाले, पैशातही काही कविता असत नाही.
फ्रॉस्ट यांचा सत्कार करताना राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी म्हणाले होते : जेव्हा सत्तेने माणसे उर्मट होतात तेव्हा कविता त्यांना त्यांच्या मर्यादांची आठवण करून देते. जेव्हा सत्ता माणसाच्या आस्थाक्षेत्राच्या सीमा संकूचित करते, तेव्हा कविता त्याला आपल्या आस्तित्वाच्या समृद्धतेची आणि विविधतेची आठवण करून देते, जेव्हा सत्ता भ्रष्ट होते तेव्हा कविता शुद्ध करते. कारण कला मूलभूत मानवी सत्ये प्रस्थापित करते. आपले सारे निर्णय, आकलन त्या सत्यांवरच आधारित असले पाहिजेत. कलाकार हा व्यक्ततीच्या मनाचा आणि संवेदनक्षमतेचा पुरस्कर्ता असतो. तो एखाद्या अतिक्रमण करणाऱ्या समाजाच्या आणि अधिकारशाही गाजवणाऱ्या राज्याच्या विरोधात जाऊ शकतो. महान कलाकार असा एकाकी असतो… कधीकधी आपले काही श्रेष्ठ कलाकार आपल्या समाजाचे कठोर टीकाकार असलेले दिसत असले तरी, त्याचे कारण हे की त्यांची संवेदनक्षमता आणि न्यायाविषयीची आस्था, कोणत्याही अस्सल कलाकाराला प्रेरित करणाऱ्याच या गोष्टी असतात, त्यांमुळेच त्यांना हे जाणवते की आपला देश आपल्या सर्वोच्च क्षमतेत कमी पडतो आहे.
अमेरिकन कवी एड्रियन रिश यांना हे नेमके कळले होते. एका परिषदेच्या उद्घाटनपर भाषणात त्या म्हणाल्या होत्या, मी कवितेकडे आदर्शवादी दृष्टीने कधीही पाहणार नाही. कवितेने हे पुष्वâळच सहन केले आहे. कविता ही काही मलम नाही किंवा ती भावनिक मसाज नाहीकिंवा एखादी भाषिक अरोमाथेरपी नाही. कविता ही कच्चा आराखडा नाहीकिंवा नियमपुस्तिका नाही किंवा जाहिरातीचा फलक नाही… वॉल्ट व्हिटमन यांनी आपल्या कवितेला स्वत:च्या अमेरिकन लोकशाहीसंबंधीच्या मर्मदृष्टीपासून दूर ठेवले नाही- ही मर्मदृष्टी गुलामगिरीच्या आर्थिक धोरणाविषयी सुरू असलेल्या सिव्हील वॉरच्या परखड परीक्षेतून तावून सुलाखून निघाली होती. पुढे त्यांनी कवितेविषयी म्हटले होते, एखाद्या संध्याकाळी दूर असलेल्या किंवा लपून बसलेल्या व्यक्ततीचे चुकून कानावर पडलेले बोलणे आहे, ज्याचे काही तुटक अंशच आपल्याला ऐकू येतात, ती संदिग्धता, आता आपण म्हणू शकतो की, लोकशाहीचीच असते.
जर्मन तत्त्ववेत्ता थिओडोर अडोर्नो यांनी विचारले होते की, होलोकॉस्टसारख्या अमानुष कृतीनंतर भावगीतात्मक कविता लिहिली जाऊ शकते का? पण एड्रियन रिश म्हणतात की जर प्रत्येक नरसंहारानंतर कविता मूक झाली असती तर या जगात कविता उरलीच नसती.
उदार कल्पनाशक्ततीला धोका असलेल्या काळात आपण जगतो आहोत, आपल्या सामूहिक जाणिवेवर आणि स्मृतीवर आघात होत आहेत. सत्य आपल्या बुटांचे बंद बांधतेच आहे, तेवढ्यात खोटेपणा आधीच सर्वदूर पसरून गेलेला आहे, कारण की तो परदेशी बूट घालून, ट्विटरवर असलेल्या विचाराप्रमाणे, सुसाट पळतो आहे. हे वाटते तितके नवे नाही, १७१० साली, अद्याप टेलिग्राफचा शोध लागलेला नव्हता तेव्हा, जोनाथन स्विफ्ट यांनी लिहिले आहे की, खोटेपणा उडत जातो आणि सत्य त्यामागे लंगडत येते. आपण अजूनही आपल्या बुटांचे बंद बांधतो आहोत.
पण आपण जर नीट लक्ष देऊन ऐकले तर आपल्याला कवी सापडतील– आपल्या कोळशाच्या खाणीतल्या साळुंक्या- गाणी म्हणत राहतील. ते ठाम सांगतात की हुकूमशाही असली तरी मानवजात संपत नाही. मिलान कुंदेरा यांनी म्हटले आहे की, सत्तेविरुद्धचा माणसांचा संघर्ष हा स्मृतीचा विस्मृतीविरुद्ध असलेला संघर्ष आहे. स्मृती आपल्याला जाणीव करून देते की काय गमावले जात आहे आणि ती संपूर्णतेच्या भाषेत बोलत नाही. केवळ सिद्ध पुरुष आणि साधुसंत, योगी आणि साध्वी, इमाम आणि मुल्ला हे अंतिम, संपूर्ण सत्य आपल्यालाच गवसले आहे अशा भाषेत बोलत असतात. पिको अय्यर यांनी लिहिले आहे की, भारतीय नेहमी संपूर्णतेच्या भाषेत बोलत असतात, पण रिलेटिव्हज् कायम त्यांच्या भोवती असतात. कवी हे सतत सूक्ष्म भेद, दुर्बोधता आणि उपरोध उलगडण्याचा प्रयत्न करतात, ते आश्चर्यचकित होऊन मागे पाहतात. भारतीय कवी अशोक वाजपेयी यांनी अलीकडेच म्हटले आहे की, सत्तेच्या, मालमत्तेच्या, अधिकारश्रेणीच्या मगरूरीपुढे कविता विनम्रता आणि नकार या दोन्ही गोष्टींसह सामोरी जाते. कविता सुलभीकरण, सामान्यीकरण, आणि गोळाबेरीज करणे याविरुद्ध अघोषित सत्याग्रहाचे हत्यार पुढे करते. कविता हा एक प्रकारचा गतिमान प्रतिरोध आहे. कविता चैतन्य आणते, नवजीवन देते, बळ देते आणि आपल्या नैतिक कल्पनाशक्ततीचा आणि सहनशीलतेचा विस्तार करते. कविता काल आणि कालातीत, इतिहास आणि शाश्वतता यांना जोडते. कविता हे कल्पनाशक्ततीचे प्रजासत्ताक आहे- ते असे ठिकाण आहे की जिथे मानवतेला सर्वात जास्त महत्त्व आहे.
रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटले आहे की एकादी छोटी मेणबत्तीसुद्धा जग उजळून टाकते. कविता या संधिप्रकाशाच्या वेळी तेच करते आहे.
मी अॅना अख्मातोवाचा उल्लेख केला. तिने तिचा मित्र ओसिप मांदेलस्ताम याला गुलाग येथे नेण्यात आलेले पाहिले, जेथून तो कधीही परत येणार नव्हता. मांदेलस्ताम याने सुरुवातीला कम्युनिस्ट राज्यक्रांतीला पािंठबा दिला होता, पण राज्यक्रांती ही अनेकदा तिच्या विचारी अनुयायांसाठी क्रुर ठरते. मांदेलस्ताम हाही त्याला अपवाद नव्हता.
स्टालिनच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत जरी त्याला गुलाग इथे पाठवण्यात आले, तरी तो स्वत:च्या मतांना दृढतेने चिकटून राहिला. आपला देश मुक्तत व्हावा यासाठी त्याचा जीव तळमळत होता. १९३५ साली त्याने लिहिले आहे,
तुम्ही सर्व महासागर आणि सर्व जागा हिरावून घेतली.
मला माझ्या बुटाएवढी जागा भोवती गज रोवून दिली.
त्यातून तुम्ही कूठे पोचलात? कूठेही नाही.
तुम्ही माझे ओठ माझ्यासाठी राखून ठेवले, ते माझ्या शब्दांना आकार देतात, स्तब्धतेतदेखील.
खरोखर शरीर बंदिस्त होऊ शकते, पण मन नाही. महान टर्किश कवी, नझिम हिकमत, यांनी अनेक वर्षे तुरुंगात घालवली, त्यांनी थर्ड क्तलास कार ५१० ही कविता लिहिली.
हा एका ट्रेनचा संदर्भ आहे, ती कैद्यांना आणि त्यांच्या पहारेकर्यांना एकाच डब्यातून घेऊन जात असे, त्यातले कैदी जखडलेले असत. हलील या कैद्याविषयी हिकमत लिहितात,
कैदी आणि त्यांचे पहारेकरी पहिल्या भागामध्ये आहेत
सार्जंट एकदाही हसला नाही
जरी रायफली बाजूला रॅकवर ठेवलेल्या असल्या,
तरी हातकड्या कूलूपबंद आहेत.
दोन्ही गट वेगवेगळ्या जगात आहेत.
कैदी हलील एक पुस्तक उघडतो.
हातकड्या घातलेल्या हातांनी पाने पलटवण्यात तो पटाईत झाला होता.
तेरा वर्षांतली ही त्याची पाचवी खेप आहे
हातकड्या आणि पुस्तकांबरोबरची.
डोळ्यांच्या खाली सुरकूत्या आहेत
आणि कपाळावरचे केस पांढरे,
हलील जरा वयस्कर दिसत असेल
पण त्याची पुस्तके, हातकड्या आणि हृदय यांना वार्धक्तय आलेले नाही.
आणि आता त्याचे हृदय नेहमीपेक्षा अधिक आशावादी आहे.
हलील पुस्तक वाचत बसतो
आणि हातकड्यांचा विचार करतो :
हातकड्यांनो, तुमच्यातल्या पोलादाचा आम्ही नांगराच्या फाळात स्वीकार करू.
आणि त्याला ही कल्पना इतकी रुचते की,
त्याला वाईट वाटते,
आपल्याला कविता लिहिण्याची कला ठाऊक नाही.
काही वेळानंतर हलील पुस्तक बंद करतो आणि चष्म्यावर तोंडाची वाफ टाकून स्वच्छ करतो.
तो बाहेरच्या मळ्यांकडे बघतो आणि त्याला आठवण होते, बॉस्पोरसच्या बोटीच्या फेर्यांची, इस्तंबूलच्या दृश्यांची, उपसागराच्या रस्त्यांवरच्या कडेकडेने असलेल्या दिव्यांची, टॉपकापी राजवाड्याची, ट्रॅमची आणि एकदा तुरुंगात असताना त्याने फुलवलेल्या पिवळ्या जिरेनियमची.
तुरुंगातला कवी एकाकी असतो, तो पत्रांची वाट पाहतो. क्यूबन कवी एंजल क्तवाद्रा याला पंधरा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. १९७९ साली त्याने लिहिले :
तुझे पत्र ही पहाटेने आणलेली कविता आहे.
पण क्तवाद्रासारख्या कवींना जो सूर्यप्रकाश हवासा वाटत होता, तो क्षणभंगुर होता, तशी ती पहाटही. कारण तो पुढे लिहितो :
पण ते पत्र ससाण्यांच्या तावडीत सापडते
आणि पडदा पडावा तशी रात्र होते
आणि माझ्या कोठडीसमोर सर्व काही होते तसेच राहते
निनावी
अंतहीन
दिवस
जात राहतात
क्तयूबानंतर आपण चीनकडे वळू या. नोबेल पुरस्कार विजेता लिउ शियाबो या तिच्या प्रिय पतीला तुरुंगात घेऊन जात असताना कवयित्री लिउ शियाने पाहिले. तेव्हा तिने लिहिले :
दरवर्षी कॅलेंडरप्रमाणे पंधरा जुलैला
नदी पाण्यावर तरंगणाऱ्या दिव्यांनी झाकून टाकली जाईल
पण ते तुझा आत्मा परत बोलावू शकणार नाहीत…
छळछावणीकडे निघालेली ट्रेन
हुंदके देत माझ्या अंगावरून गेली
पण मी तुझा हात हातात घेऊ शकले नाही…
अभाव, सावल्या आणि अंध:काराच्या वास्तवात कैदी जगत असतात. इराणी कवी रेझा बराहनी, ज्याला शाहने कैदेत टाकले होते, त्याने १९७३ साली लिहिले आहे :
रात्र ही गजापलीकडे असलेल्या दिवसासारखी आहे
या बाजूला दिवस रात्रीसारखा आहे.
पण ती रात्रही सुंदर असते. ग्रीक कवी यानीस रित्सोस याला १९६० साली लष्करी जुंटाने कैद केले होते, तो लिहितो :
उंच निलगिरीचे झाड घवघवीत चंद्राबरोबर
एक तारा पाण्यावर थरथरतो.
आकाश पांढरे, चंदेरी.
दगड, उघडेबोडके.
जवळच्या उथळ पाण्यावर ऐकू येतो
एखादा मासा उडी मारताना दोनदा तीनदा,
अतिप्रसन्न, भव्य अनाथपण- स्वातंत्र्य.
किम ची हा यांनी दक्षिण कोरियाच्या लष्वâरी हुकूमशाहीला विरोध केला. तुरुंगात त्यांना स्वातंत्र्याचा अभाव, आणि मुख्यत: आपल्या आईची उणीव भासत होती. ते लिहितात :
आकाशात उंच उडणाऱ्या हंसांनो
तुम्हाला कळते आहे का मला कसे वाटतेय?
आमच्या झोपडीजवळच्या नव्या रस्त्यावर माझी आई उभी आहे का,
माझी वाट पाहत
हे तुम्ही मला सांगू शकता का?
ती नि:शब्दपणे रडते आहे का? सेऊलच्या दिशेने पाहत,
जुने कपडे घालून?
हंसांनो माझ्या आईला सांगा
मी परत येईन,
मी परत येईन जरी मी मरण पावलो असलो तरी-
मी या तुरुंगाच्या भिंतींना भेदून
कुंपणावरून उडी मारून
सैतानाला माझा आत्मा विकावा लागला तरी.
मी परत येईन, आई, काहीही झाले तरी, मी परत येईन.
२०१५ ते २०२१ या कालावधीत पेन इंटरनॅशनलच्या तुरुंगातील लेखकांच्या समितीचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. तुरुंगात डांबलेले कित्येक लेखक, कवी, पत्रकार, संपादक, ब्लॉगर्स, प्रकाशक मुक्तत व्हावेत यासाठी आम्ही अभियान केले.
अनेक जण पुष्कळ काळ तुरुंगातच आहेत. २०१५ साली कॅमेरूनियन कवी एमोह मेयोमेस यांना मुक्तत केले गेले त्यावेळी आम्हाला थोडेसे यश मिळाले. ते तुरुंगात असताना फ्रेंच लेखक आंलाँ माबांकू यांनी त्यांना एक पत्र लिहिले होते. ते प्रकाश टाकणारे आहे. कारण ते आपल्याला दाखवून देते की जेव्हा एखादे सरकार कवीला तुरुंगात टाकते तेव्हा ते केवळ एका व्यक्ततीला कैद करीत नाहीत, त्याहून अधिक काही घडते. माबांकू यांनी लिहिले आहे :
तुम्ही या कैदेत एकटे नाही. कारण जेव्हा लेखक तुरुंगात डांबले जातात तेव्हा त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या कोठडीत येते वाचकांचे एक सैन्य आणि त्यांच्या संतापलेल्या सहकाNयांच्या पावलांचे आवाज. हा आशावाद मनात ठेवून मी हे पत्र तुम्हाला लिहीत आहे, तुम्हाला आठवण द्यायला की आम्ही तुमचे नाव उच्चारणे कधीच थांबवणार नाही आणि जगातल्या प्रत्येक घराच्या छतावरून तुमच्यावर झालेल्या अन्यायाचा आणि न्यायव्यवस्थेने दाखवून दिलेल्या तुमच्या अवमानाचा आम्ही धिक्कार करू.
एका लेखकाला कैद करून ते आगीशी खेळताहेत : आपल्या कल्पनाशक्ततीच्या भोवती तेभिंती कशा काय उभारू शकतील? त्यांना माहिती आहे की तिला दोन अजस्र पंख आहेत आणि प्रत्येक ऋतूत ती स्वातंत्र्याची सूक्ते गाते?
आम्ही तुमचे शब्द पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात पसरवतो आहोत. भाषणस्वातंत्र्याच्या शत्रूंना याची आठवण करून द्यायला की मानवजातीचा विकास रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक अडथळ्याच्या चिंध्या करणारे शब्द वापरणारे एक अदृश्य आणि अजिंक्य सैन्य चालून येते आहे.
जेव्हा एखादे सरकार कवीला तुरुंगात टाकते तेव्हा त्या सरकारने फक्त त्या कवीलाच स्तब्ध केलेले नसते तर त्याने स्वत:चेही हात बांधलेले असतात. माझी प्रिय मैत्रीण बर्मीज लेखक, मा ठिडा हिचीच गोष्ट घ्या. तीन दशकांपूर्वी जेव्हा सरकारने निदर्शने करणार्यांवर कारवाई केली तेव्हा कैद झालेल्यांमध्ये तिचा पहिला क्रमांक होता. हळूहळू बंदिस्त असताना तिची प्रकृती खालावत गेली. तुरुंगाधिकार्यांना वाटले की तिला आपण खचवून टाकू आणि चौकशीच्या दीर्घ सत्रांमध्ये तिला थकवून कबुलीजबाब द्यायला लावू. पण ठिडा ही पोलादासारखी अत्यंत कणखर होती. चौकशी करणारे थकून जात, पण त्यांनी तिला प्रश्न विचारत राहावे असा तिचा आग्रह असे. वैतागून एका अधिकाऱ्याने तिला सांगितले की तू कैदेत आहेस, पण तू मुक्त आहेस, खरे म्हणजे आम्ही मुक्त असायला पाहिजे, पण आम्हाला वाटते की आम्हीच कैदेत आहोत.
हुकूमशहा अशा प्रकारची सत्ता कवीवर गाजवू शकतात, कारण काही मूठभर स्त्री-पुरुष मूक संमती द्यायला आणि गुन्ह्यात सामील व्हायला तयार असतात- ते मूठभर स्त्रीपुरुष, ते साथीदार, डॅनियल गोल्डहॅगनच्या शब्दांत सांगायचे तर, स्वेच्छेने बनलेले वधिक असतात.
कवी केवळ राजकीय सत्तेच्या विरोधात बोललेले नसतात, त्यांचा क्रोध आर्थिक सत्तेच्या विरोधातही असतो. कवी केन सारो विवा हे १९९५ साली नायजेरियन सेनेने ठार केलेल्या ओगोनी पर्यावरणीय आणि मानवी हक्काच्या नऊ कार्यकत्र्यांपैकी एक होते. त्यांनी स्वातंत्र्य म्हणजे काय असते आणि काय नसते याविषयी एक प्रभावी कविता लिहिलेली आहे :
खरा तुरुंग
गळके छत नव्हे
किंवा गुणगुणणारे डास नव्हेत
या दमट दळभद्री त्रस्त कोठडीत
तुरुंगाचा अधीक्षक तुम्हाला आत कोंडतो तेव्हा होणारा
वकिल्लीचा खणखणाट नव्हे
एकाद्या पशूला किंवा माणसाला खाण्यायोग्य नसलेला
हा नगण्य शिधा नव्हे
रात्रीच्या कोरेपणात उतरणारी
ही दिवसाची शून्यता नव्हे
हे नव्हे
हे नव्हे
हे नव्हे
ही आहेत असत्ये तुमच्या कानात पिढ्यान् पिढ्या
ताशाप्रमाणे वाजवली जाणारी
हे आहेत माथेफिरूप्रमाणे धावणारे सुरक्षा अधिकारी
दिवसाच्या एका भिकार जेवणाच्या बदल्यात
निष्ठुर अनिष्ट हुकूम अमलात आणणारे
दंडाधिकारी आपल्या पुस्तिकेत एक शिक्षा लिहिते
आणि तिला ठाऊक आहे की ती अनुचित आहे
नैतिक जराजर्जरावस्था
मानसिक गलथानपणा
हुकूमशहांचे मांस
आपल्या अध:पतित आत्म्यांमध्ये दबा धरून बसलेल्या
भेकडपणाला दिलेला आज्ञाधारकतेचा मुखवटा
ती भीती असते आपल्या विजारी ओल्या करणारी
आणि त्या आपण धुण्याची हिंमतदेखील करू शकत नाही
हे आहे ते
हे आहे ते
हे आहे ते
प्रिय मित्रा, जे आपले मुक्त जग
कंटाळवाण्या तुरुंगात बदलते
दुसऱ्या ज्या कवीने आर्थिक व्यवस्थेला आव्हान दिले तो आहे अश्रफ फयाद, बाह्यत: त्याच्यावर ईश्वरिंनदेचा आरोप आहे. तेलाने आपल्या समाजाच्या नैतिक तंतूंचे काय करून टाकले आहे हे पाहून तोही सारो विवाप्रमाणे भयचकीत आहे. तो आहे पॅलेस्टाईनचा, पण राहतो सौदी अरेबियात. त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली होती. पण सातत्याने चाललेल्या आंतरराष्ट्रीय अभियानामुळे त्याची शिक्षा जन्मठेप व आठशे फटके एवढी कमी करण्यात आली. अश्रफ फयादने लिहिले :
आपला आत्मा हरवण्यात वेळ वाया जातो,
तेलाचे अश्रू गाळल्यानंतर,
डोळे शांत करायला जेवढा वेळ लागेल त्याहून अधिक.
तेलाच्या बाजारात कूणालाही रक्तत विकत घेण्यात स्वारस्य नसते,
तसा विस्थापित हताश असतो,
दारिद्र्याचा अंश ते मागे ठेवते हे वगळता पेट्रोल तसे निरुपद्रवी असते
तेलाची आणखी एक खाण सापडलेल्यांचे चेहरे
त्या दिवशी जसे काळवंडतात,
तुमच्या हृदयात जेव्हा जगणे फुंकले जाते
लोकांच्या वापरासाठी तुमच्या आत्म्यातून अधिकाधिक तेल काढण्यासाठी
ते असते तेलाचे आश्वासन, खरे आश्वासन.
कवींना नि:शब्द करू पाहणारे जुलूमशहा आहेत, कारण जुलूमशहांना न आवडणाऱ्या भाषेत कवी लिहीत असतात. आरोन अताबेक हा कझाक कवी स्वत:च्या भाषेत लिहू इच्छित होता, म्हणून तुरुंगात टाकला गेला..
माझा कंठ बोलू शकत नाही, नष्ट होईल
माझ्या जन्मभूमीच्या आवाजांसाठी.
माझ्या पूर्वजांची कूजबुज नाहीशी होऊन जाईल
रेतीत पाणी विरून जाते त्याप्रमाणे.
मी अमरत्वाचा कथाकार आहे
सेमेटिक आणि युट्रस्वâन भाषेत सांगणारा;
मी तुर्की बोली भाषेची धूळ आहे
रशियनमध्ये लिहिणारा.
आणि मग घ्या अंतिमत: वर्ज्य असलेला विषय, धर्म : सौदी लेखक हमजाह काशगरी यांनी, अस्सल मुस्लीम प्रेषित समजतात त्या महंमद पैगंबर यांच्याशी असलेल्या त्यांच्या नात्याविषयी त्यांना काय वाटते याविषयी तीन काव्यात्मक ट्वीट केल्या आहेत.
तुमच्या जयंतीच्या दिवशी मी म्हणेन की मला तुमच्यातला बंडखोर आवडतो, की तुम्ही नेहमीच माझ्यासाठी स्फूर्तीचा एक स्रोत आहात आणि तुमच्याभोवती असलेले देवत्वाचे तेजोमंडल मला आवडत नाही, मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार नाही.
तुमच्या जयंतीच्या दिवशी मी कूठेही वळलो तरी मला तुम्हीच दिसता, मी म्हणेन की मला तुमचे काही पैलू प्रिय आहेत आणि काही नाहीत आणि कित्येक समजतही नाहीत
तुमच्या जन्मदिनी मी तुम्हाला नमन करणार नाही, मी तुमच्या हाताचे चुंबन घेणार नाही, याउलट दोन समान ज्याप्रमाणे करतात त्याप्रमाणे मी ते हात हातात घेऊन हलवीन आणि तुमच्याकडे पाहून हसेन, जसे तुम्ही माझ्याकडे पाहून हसता. मी तुमच्याशी एक मित्र या नात्याने बोलेन, एवढेच.
अशा आपली मते व्यक्तत करणाऱ्या शब्दांनी सरकारे, धार्मिक नेते, सामर्थ्यशाली व्यावसायिक आणि दक्ष असणारे यांचा रोख कवींकडे आणि लेखकांकडे वळवला. परंतु सोव्हिएत साम्राज्य आता अस्तीत्वात नाही, मांदेलस्तामचे शब्द मात्र आहेत. लिउ शियाबो यांना सन्माननीय दफनविधी मिळाला नाही. त्यांची राख समुद्रात टाकली गेली जणू त्यांच्या आqस्तत्वाचे नावनिशाण उरू नये यासाठी- त्याने मला कविता लिहायला प्रवृत्त केले. तिचा एक भाग असा आहे :
आणि त्यांना चिंता वाटत होती की जर त्यांनी त्यांची राख एका कुंभात टाकून तो एका रॉकेटला बांधून आकाशात उडवला असता आणि त्या रॉकेटला बांधलेला तो कुंभ अवकाशात ती राख पसरवून देईल अशी व्यवस्था केली असती तर त्या राखेचा प्रत्येक कण एक तारा बनेल
कारण तो कवी हे एक बीज होते आणि पालक आपल्या मुलांना त्या तार्यांचे नाव देतील
ते काय असते जे गणवेश घातलेल्या माणसांचे पशूंमध्ये रूपांतर करते, लोकांना अकारण तुरुंगवास सुनवणारे न्यायाधीश बनवते, लोकांकडून कबुली घेण्यासाठी त्यांची नखे उचकटून टाकण्यात ज्यांना काहीच वाटत नाही अशा छळणूक करणार्यांमध्ये बदलते, एखाद्या देशाचे चैतन्य नष्ट करून टाकणाऱ्या सेनापतींमध्ये रूपांतर करते, ते शिक्षेचे भय न बाळगता ते वागत असतात, पण जगाच्या रोखून पाहणाऱ्या नजरेला त्यांना तोंड द्यावे लागते. कवी कॅरलाईन फोर्श यांनी साक्षीच्या कवितेची व्याख्या केली आहे :
साक्षीची कविता ही राजकीयतेपासून सामाजिकता वेगळी काढते आणि असे करताना व्यक्ततीला बेकायदेशीर जुलुमापासून वाचवते. त्यांनी त्यांच्या एका प्रसिद्ध कवितेत, एका जनरलबरोबर झालेल्या भेटीविषयी लिहिलेले आहे. तुम्ही जे ऐकले आहे ते खरे आहे.. त्या लिहितात : जनरल भयावह गोष्टी सांगतात, त्यांना आव्हान देतात, विचारतात, तुमच्या कवितेसाठी, नाही का? आणि त्या पुढे लिहितात : जमिनीवर असलेल्या काही कानांना ऐकू गेले त्यांच्या आवाजाचे तुकडे, जमिनीवरचे काही कान दाबून ठेवले गेले होते.
कवी हे तेच जमिनीला लागलेले कान आहेत. पट्टी बांधलेल्या अवस्थेतसुद्धा ज्यांना दिसू शकते असे डोळे ते आहेत. ते त्या जिभा आहेत ज्या फाटल्यानंतरसुद्धा खूप काळ बोलू शकतात आणि ती मने आहेत जी पिंजर्यात घालता येऊ शकत नाहीत. कविता ही हाँगकाँगमधली छत्री आहे, कायरोमधील मोबाईल फोन आह, आणि टँक समोर असलेला तियानमेनमधला माणूस आहे.
आल्बेर कामूची आठवण येते : बंदिस्त जगाला तोंड देण्यासाठी असणारा एकमेव मार्ग म्हणजे स्वत: इतके मुक्त असावे की तुमचे अस्तित्व हेच बंडखोरीची कृती असेल.
उलटून येणाऱ्या रागाचा काही अंदाज करता येत नाही. पारुल खखर ही गुजराती कवयित्री मनाला शांतवणारी हळुवार यमकबद्ध कविता लिहीत असे, जी कधीच राजकीय समजली गेली नाही. त्यांनी गझला आणि गीते लिहिली. मान्यवरांनी त्यांची तारीफही केली होती. धार्मिक हिंदूंना अत्यंत पवित्र अशा गंगेत तरंगणाऱ्या प्रेतांची दृश्ये पाहून खखर यांना धक्का बसला, तेव्हा भारतात महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते, आणि असंख्य माणसे मेली होती. सरकारच्या निष्काळजीपणामुळे हादरून गेल्यामुळे त्यांनी एक कविता लिहिली : शववाहिनी गंगा. गंगेची शववाहक गाडीबरोबर तुलना करणारी. या कवितेचे मी भाषांतर केले.
ज्वाला उंच उठतात आणि आकाशापर्यंत पोचतात, क्रोधग्रस्त शहर संतापून उठते
हे राजा तुझ्या रामराज्यात तुला गंगेत वाहणारी प्रेते दिसतात काय
एका रात्रीत त्या जनतेच्या शत्रू झाल्या. अनेक वाचक आणि त्यांचे पाठीराखे, ज्यांना त्या पूर्वी आवडायच्या, आता त्यांना त्यांच्याकडूनच अतिशय ओंगळ, गलिच्छ अपशब्द ऐकावे लागले. त्यांच्यावर कूठल्याही कायद्याखाली आरोप करण्यात आला नाही- मृतांबद्दल सहानुभूती व्यक्त करणे हा काही गुन्हा मानला जात नाही; पण त्यांनी स्वत:चे समाजमाध्यमांवरील अकाऊंटस् बंद करावे इतकी धास्ती त्यांना वाटली.
आणि तरीही त्या विचलित न होता गुजराती मासिकांत लिहीत आहेत. त्यांच्यावर टीका करणार्यांना आडून सूक्ष्मपणे त्या उत्तरही देत आहेत. त्यांच्या अलीकडच्या नव्या कवितेत, त्यांनी त्यांच्या स्तब्धतेचे स्पष्टीकरण दिलेले आहे; तिचेदेखील मी भाषांतर केले आहे :
वेदना असह्य होईल पण तुम्ही काहीही बोलणार नाही;
तुमचे अंत:करणकिंचाळेल, तरी तुम्ही बोलणार नाहीत.
क्षणभंगुर घटनांमुळे आपले आवाज बंद व्हावेत असे आपण होऊ देत नाही. सॅटनिक व्हर्सेसमध्ये बाळ म्हणतो त्याप्रमाणे कवीने जगाला निद्रेत गडप होण्यापासून थांबवले पाहिजे. आपण जागे राहायलाच हवे, आणि एक दिवस त्या स्वातंत्र्याच्या स्वर्गात, जिथे आपले मन भयभीत नसेल आणि जिथे आपले मस्तक उंचावलेले असेल, तिथे, टागोर यांनी गीतांजलीत लिहिल्याप्रमाणे, आम्ही जागे होऊ.
शिल्पा गुप्ता यांनी शूर कवींना वाहिलेली आदरांजली आपल्याला प्रेरणा कशी मिळू शकते याचे स्मरण करून देते. त्या आपल्यापुढे एक आरसा धरतात, आपल्याला त्यात पाहायला भाग पाडतात. आपण त्यात पाहिलेच पाहिजे.
– शिल्पा गुप्ता
शिल्पा गुप्ता एक प्रख्यात शिल्पकार आणि इन्स्टॉलेशन आर्टिस्ट आहेत. त्यांनी मुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ फाइन आर्ट्समध्ये शिल्पकलेचा अभ्यास केला आहे. शिल्पा अनेक माध्यमांतून व्यक्तत होत असतात, जसे सापडलेल्या वस्तूंपासून केलेले इन्स्टॉलेशन्स, इंटरॅक्टिव इन्स्टॉलेशन्स, आणि व्हिडीओ. शिल्पा यांच्या कलाकृती आणि इन्स्टॉलेशन्स जगातील अनेक अग्रगण्य आर्ट गॅलरीज, शहरांमधून आणि संग्रहालयांतून वेळोवेळी प्रदर्शित होत असतात. अनेक देशी-विदेशी कला प्रकल्पांच्या आयोजन आणि नियोजनातही शिल्पा यांचा सक्रिय सहभाग असतो. मुंबईच्या रस्त्यांवर किंवा रेल्वे स्थानकांवर केलेल्या भटकंतीत सापडलेल्या वस्तूंना शिल्पा आपल्या इन्स्टॉलेशन्समध्ये वापरतात आणि त्यांना एक नवे परिमाण देतात. २०१२ मध्ये मधुश्री दत्ता द्वारा संपादित ‘डेट्स साइट्स: प्रोजेक्ट सिनेमा सिटी बॉम्बे/मुंबई’ या पुस्तकाचे डिझाइन शिल्पा यांनी केले आहे. अलीकडेच कार्टर रोड, मुंबई येथे त्यांचे वास्तव्य असलेल्या परिसरात ‘वी चेंज इच अदर’ हे उल्लेखनीय इन्स्टॉलेशन त्यांनी निर्माण केले आहे. -सलिल त्रिपाठी
मराठी अनुवाद : राही डहाके